---|| राजे ||---

Thursday, September 13, 2012

बहिण नको कशी? भावाचे भाव कथन


 जन्माला न आलेल्या बहिणीच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठी मी आज माझे मनोगत व्यक्त करतोय. मी त्या जन्माला न आलेल्या बहिणीचा दादा मलाही माझं मन तिच्यापुढे मोकळं करायचं आहे. बहिण म्हणजे वादळात दिव्याभोवती पसरणारे हात संकट काळात खांद्यावर हात ठेवणारी अलगत साथ भावाची भाषा बहिणीला कळते कधी आशा तर कधी निराशा वेगवेगळ्या आपल्या जरी दाही दिशा ताई! अग तुला कोणी सांगितले माझं तुझ्यावर प्रेम नाही म्हणून मला तुझी आठवण येत नाही म्हणून, अग मलाही तुझी खुप आठवण येतेय ग! अग तु नाही म्हणून मी कोणाकडूनही राखी बांधून घेतली नाही. ओवाळून घेतले नाही कारण मला माहित आहे तुझ्या प्रेमाची सर कुणालाही येणार नाही. आई म्हणाली ये बाळा मी राखी बांधते तर मी म्हणालो काही नको तुझ्या हातची राखी. राखी बांधाणार्‍या माझ्या बहिणीच अस्तित्व नष्ट केलेस आणि आता कशाला राखी? राहू दे माझा हात सुना, कळु दे जगाला माझ्या आईबाबांना वंश पुढे चालवायला फक्त मुलगाच हवा होता म्हणून. आणि हो अग मला माहितच नव्हतं ग माझी छोटी माझ्यावर एवढे प्रेम करतेय पण तू चांगलेच झणझणीत अंजन घातलेस माझ्या डोळ्यात, पण तुला अस का वाटत माझ तुझ्यावर प्रेम नाही मला तुझी आठवण होत नाही. अग तुम्हा बायकांना बोलून तरी दाखवता येत पण आम्हा पुरुषांना तेही व्यक्त करता येत नाही, पण आता खूप झाल तुझ्या प्रत्येक प्रश्‍नाच उत्तर देणार आहे मी. मलाही वाटत होतं, मलाही एक गोड बहिण हवीय, मला शेवटपर्यंत साथ देणारी, माझ्याबरोबर भांडणारी, माझ्यावर रुसणारी, माझ्या खोड्या काढणारी, माझ्यावर खोटचं रागवणारी, पण सांगना मी तरी काय करू शकलो, आईबाबांच्या इच्छेपुढे माझं काहीच चाललं नाही गं! आणि ते सगळ कळण्याइतपत माझं वयही नव्हतं ग, तेव्हा माझीही खुप खुप स्वप्न होती गं मलाही तुझ्यावर खुप प्रेम करायचं होतं. तुझ्यासाठी प्रत्येक राखी पौर्णिमेला, भाऊबिजेला नवीन काहीतरी करायचे होते. तुझ्यासाठी नवीन नवीन वस्तु खरेदी करायच्या होत्या, तुला ओवळाणी द्यायची होती. तुझ्या हातची राखी बांधून ऐटीत मिरवयाचे होते, तुझ्यासाठी डोली सजवून भाऊजींची खूप खूप मस्करी करत त्यांचा कान पिळायचा होता आणि तु सासरी जाताना तुझ्या कुशीत शिरून खूप रडायच होते, तुझ्या मुलांचा लाडका मामा होवून त्यांचे खूप लाड करायचे होते, त्यांचं कौतुक करून त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवायचा होता, पण नियतीला ते खरच मंजूर नव्हतं ग! अग बहिणीची माया, बहिणीच प्रेम काय असतं हे फक्त बहिण असणार्‍यांनाच समजत असं नाही ग उलट ज्यांना बहीण नाही त्यांनाच तिच जास्त महत्त्व असतं. आणि मग डोळ्यात पाणी येवून म्हणावसं वाटतं. बाजार फुलांचा भरला मज बहिण मिळेना एक

आणि हो तू सांगितल्याप्रमाणे उतरलोय बर या युद्धात आता माघार नाही घेणार कारण तु माझी कृष्णाच्या बोटाला साध कापल म्हणून स्वतःचा भरजरी शालू फाडणारी द्रोपदी बहिण आहेस ना! मग मलाही पळवून आणलेल्या यौवन स्त्रीची खणा नाराळांनं ओटी भरून तीची पाठवणी करणारा शिवाजीमहाराजांसारखा भाऊ नको का व्हायला आणि आता आईबाबांना सांगून तरी काय उपयोग आहे म्हणा. कारण वेळ तर कधीच निघून गेलीय ग! पण तुला एवढेच सांगतो की तु एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी असे म्हणून पुन्हा जन्म घे आणि तोही माझ्या पोटी बरं का, मग बघू आई बाबा काय करतायत ते त्यांच्या चुकीची शिक्षा मी भोगतोय, त्यांच्यामुळे किती मोठ्या सुखापासून वंचित राहिलोय आणि आता त्यांनी पश्‍चाताप करूनही काय उपयोग आहे म्हणा. माझ्या मुलीच्या रुपात मी तुला शोधेन, तीच्याकडून ओवाळून राखी बांधून घेईन आणि मग बघ आपल्या जीवनात कसा आनंद पसरेल त्याचबरोबर जगाला ओरडून सांगेन. भराभराटीमध्ये साथ देणार्‍या हजारो नात्यांपेक्षा मिळावी अशी एखादीच बहिण, राहावी तिच्यावर सुखदुःखांची भिस्त, आणि वाढावी दोघांचीही प्रतिष्ठा.

मग ऐकशील ना माझं? घेशील ना पुन्हा जन्म? अग आता तुझा भाऊ खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे, आणि आता माझ्या मनाला, जगाला, आई बाबांना कळलेय गं! मुलगी म्हणजे वेलीवरती आलेल फुल, स्वार्थापायी झालेली ती एक भूल मुलगी म्हणजे विधात्याला पडलेले एक स्वप्न नवरत्नांच्या हारामधील अनमोल असे रत्न मुलगी म्हणजे भावाला संकटात मदत करणारी प्रसंगी कठोर ही होत शिक्षा देणारी साथ सगळ्यात आधी असतो तिचा मदतीचा हात मुलगी म्हणजे दोन घर जोडणारी अरुंद पायवाट नात्याचा दुसरा अर्थ जणू बहिण भावाची रेशीम गाठ आणि या दुनियेलाही ठणकावून सांगेन का असे स्वतःहून अभागी होताय? का हे पाप करताय? वंश पुढे चालवणार्‍या मुलाच्याही मनात कधी डोकावून पहा त्याला काय हवयं, मिळू द्या त्याला त्याच्या बहिणीची माया, तीही त्याची गरजच आहे ना? मग का असे वागताय? का त्यांना एकमेकांपासून दुर करताय? आणि समस्त स्त्री वर्गाला विचारतोय की स्वतः एक स्त्री असून स्त्रीच्याच जिवावर उठता, अहो प्रत्येकाला मुलगाच हवा आहे, त्या मुलांना बायका कशा मिळणार त्यांचा वंश पुढे कसा चालणार आहे का, उत्तरे या प्रश्‍नांची नाही ना मग सावरा आता तरी अजूनही वेळ गेलेली नाही.

सोडून द्या त्या जुन्या रुढी, देशाची खरी प्रगती करायची असेल तर मुलींना जन्माला येवू द्या, कारण खरतंर त्याच उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात, शांत संयमी परोपकारी कुठल्याही वादळवार्‍यात निश्‍चतपणे उभ राहण्याची प्रवत्ती त्यामुळातच त्या जन्माला येतानाच घेवून येत असतात, मग का त्यांना असे उखाडून टाकताय? का त्यांची गर्भातच हत्या करताय? तिलाही जन्माला यायचा अधिकार आहे, उघडा डोळे आता तरी, द्या तिला मुलाच्या बरोबरीचे स्थान, मग बघा तुमच्या जीवनात किती आनंद येईल, तीही तुमचं नाव नक्कीच उज्ज्वल करेन कदाचित माझा हा लेख वाचून तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव नक्कीच होणार आहे, मग नका तिचा अंत पाहू घेवू द्या तिला मोकळा श्‍वास, दुनियेच्या चालीन चालण्यापेक्षा कधी तरी जगावेेगळा निर्णय घेवून पहा, याचा नक्कीच तुम्हाला कधी पश्‍चाताप होणार नाही. जीवाशी जडता जीव, मनाशी मनाचा भाव सुखाचा गवसे गाव, बहिण तयाचे नाव ताई अंग मी माझी मानसिकता बदललीय ग आता, खरोखर निर्धारपणे, खराखूरा आता मी ठामपणे तुझ्या पाठीशी उभा राहिन तु काळजी नको करूस, मला जमतील तेवढे प्रयत्न मी नक्कीच करीन आणि वचन देतो तुला की याबाबतीत कितीही विरोध झाला तरी माझा, निर्णय मी बदलणार नाही कारण जगण्याच, संकटाशी झुंजण्याचं बळ मला तु दिले आहेस, माझी शक्ती तु आहेस, माझी प्रेरणा तु आहेस, मला पडल्यावर उठवणारी तु आहेस, म्हणून तुझा दादा या नात्याने तुला सांगतोय, क्षणा क्षणाला तुझी स्मृती गं कुठुनही कशी दिसावी सुन्या सुन्या घरात माझ्या गं जन्माला तु पुन्हा यावीस मग घेशील ना पुन्हा जन्म, ऐकशिल ना माझं एवढं, मी वाट पाहातोय तुझ्या आगमनाची होवू माझी सगळी स्वप्न पुर्ण नाही होवू देणार भ्रुण हत्या, थांबणार हे सगळं आता मग ये लवकर बहिणीने लावावा जीव भरून काढावी उणीव असावी आखीव रेखीव चौकट आपुल्या नात्याची विरहात होतो भास ओढ सतावी जीवाला ज्याला नाही बहिण सल समजे त्याला.

राजगुरुनगर
कल्पना आर. शिंदे


संदर्भ: http://www.janhindola.com/News.aspx?nws=thk&id=000000029

1 comment:

  1. भावा रडवलस रे ....खूप च छान

    ReplyDelete